महत्त्वाच्या साईट्स

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

पृथ्वीच्या पोटात लपलेल्या पाण्याचे रहस्य!


आपण आपल्या पृथ्वीला निळा ग्रह म्हणतो. ही वसुंधरा महासागरांनी वेढलेली आहे. पण 4.6 अब्ज वर्षांपूर्वीची पृथ्वी आजच्या सारखी शांत व जीवनदायी नव्हती. त्या काळातील पृथ्वी पूर्णपणे वितळलेली होती. सर्वत्र अग्नी, ज्वालामुखी व उष्णतेचे साम्राज्य होते. ग्रह सतत उल्कावर्षावाने झोडपला जात होता. या स्थितीत पृथ्वीवर पाणी टिकणे अशक्य आहे, असे आजपर्यंत शास्त्रज्ञ मानत होते. पाणी असेलच तर ते वाफ बनून अंतराळात निघून गेले असावे, असा जुना समज होता. पण एका नव्या संशोधनामुळे हा समज बऱ्यापैकी चुकीचा ठरला आहे.

पृथ्वीच्या गाभ्यातील खनिजाने ठेवले पाणी जपून

Science या जगप्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात पाणी अंतराळात उडून गेले नाही, तर ते पृथ्वीच्या खोल गाभ्यात सुरक्षितपणे साठवले गेले. संशोधकांच्या मते, पृथ्वी जेव्हा अगदी आगीच्या गोळ्यासारखी होती, तेव्हा तिच्या मँटलमधील विशिष्ट खनिजांनी पाण्याला स्वतःमध्ये  शोषून घेतले. त्यामुळेच आज आपण पाहतो ते महासागर अस्तित्वात येऊ शकले. हा शोध पृथ्वीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

मँटल हजारो किलोमीटर लांबवर पसरलेले

पृथ्वीच्या आतील भागाला मँटल असे म्हणतात. हा भाग जमिनीखाली सुमारे 660 ते 2900 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेला आहे. या मँटलमध्ये ब्रिजमनाइट नावाचे एक खनिज मोठ्या प्रमाणावर आढळते. हे खनिज पृथ्वीवर सर्वात जास्त असलेल्या खनिजांपैकी एक मानले जाते. पृथ्वीच्या मँटलचा तब्बल 60 टक्के भाग याच खनिजाचा बनलेला आहे. ब्रिजमनाइटची रचना अत्यंत दाट व स्थिर असून ती प्रचंड दाब आणि उष्णता सहन करू शकते.



संशोधकांनी प्रयोगशाळेत निर्माण केली सुरुवातीची स्थिती

संशोधकांनी प्रयोगशाळेत पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळासारखी परिस्थिती निर्माण केली. हजारो अंश सेल्सिअस तापमान आणि अत्यंत प्रचंड दाबाच्या स्थितीत ब्रिजमनाइटवर प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांमधून एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. जितकी उष्णता आणि दाब वाढतो, तितकी ब्रिजमनाइटची पाणी साठवण्याची क्षमता वाढते. म्हणजेच ज्या परिस्थितीत पाणी टिकणार नाही असे वाटत होते, त्याच परिस्थितीत पाणी खनिजांच्या संरचनेत सुरक्षित राहू शकते, हे सिद्ध झाले.

हे पाणी द्रव स्वरूपात नसते, तर ते खनिजांच्या क्रिस्टल संरचनेत हायड्रोजनच्या रूपात अडकलेले असते. त्यामुळे पाणी उकळून निघून जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. संशोधकांच्या मते पृथ्वीच्या सुरुवातीच्या मँटलमध्ये आजच्या महासागरांइतके, कदाचित त्याहूनही जास्त पाणी साठवले गेले असावे. म्हणजे आपण आज जे महासागर पाहतो, ते पृथ्वीतील पाण्याच्या एकूण साठ्याचा केवळ एक भाग असण्याची दाट शक्यता आहे. 

पाणी गाभ्यातून झिरपून हळूहळू वर आले

संशोधकांच्या मते, पृथ्वी कोट्यवधी वर्षांच्या कालखंडात हळूहळू थंड होत गेली. मँटल व भू-प्लेट्सची हालचाल तथा ज्वालामुखींचे उद्रेक यामुळे आत साठलेले पाणी हळूहळू पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊ लागले. ज्वालामुखींतून बाहेर पडणाऱ्या वायूंमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाफ असते. ही वाफ थंड झाल्यानंतर पावसाच्या स्वरूपात पृथ्वीवर कोसळली आणि महासागर, नद्या व तलावांची निर्मिती झाली.

या प्रक्रियेमुळे पृथ्वीवर वातावरण तयार झाले. पाण्याच्या उपस्थितीमुळे तापमान संतुलित राहू लागले आणि रासायनिक अभिक्रियांना चालना मिळाली. याच अभिक्रियांमधून पुढे जीवनाच्या पहिल्या चिन्हांची निर्मिती झाली. म्हणजेच पृथ्वीच्या गाभ्यात साठवलेले हे पाणी केवळ महासागरांचेच नव्हे, तर संपूर्ण जीवनसृष्टीचेही मूळ ठरले.

पृथ्वी बाहेरून दिसते तेवढी साधी नाही



या संशोधनामुळे पृथ्वीची गुपिते किती खोलवर दडलेली आहेत, हे स्पष्ट होते. पृथ्वी फक्त बाहेरून दिसते तितकी साधी नाही, तर आतून ती एक अत्यंत जटिल आणि आश्चर्यकारक यंत्रणा आहे. तिच्या गाभ्यातील खनिजे, दाब, उष्णता आणि पाणी यांचा परस्पर संबंध आजच्या आपल्या वसुंधरेच्या निर्मितीस कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे पृथ्वीवरील पाण्याचा उगम केवळ बाह्य उल्कांवर अवलंबून नसून, तो पृथ्वीच्या आतल्या प्रक्रियांशीही संबंधित आहे, हे आता स्पष्ट होत आहे.

इतर ग्रहांवरही पाणी असेच लपले आहे काय?

उल्लेखनीय बाब म्हणजे पृथ्वीच्या गाभ्यात इतक्या टोकाच्या परिस्थितीत पाणी टिकू शकते, तर इतर ग्रहांवर किंवा ग्रहसदृश खडकांमध्येही पाणी साठले गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यातील अंतराळ संशोधन आणि जीवनाच्या शोधासाठी हा शोध अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

एकेकाळी आगीच्या गोळ्यासारखी असलेली पृथ्वी आज जीवनाने फुललेली आहे, यामागे तिच्या गाभ्यात दडलेले पाण्याचे रहस्य आहे. पृथ्वीने आपली ही अमूल्य संपत्ती खोल आत जपून ठेवली आणि योग्य वेळी ती बाहेर काढली. यामुळेच आज आपण महासागरांच्या सान्निध्यात उभे राहून पृथ्वीच्या या अद्भुत इतिहासाकडे विस्मयाने पाहू शकतो.

३ टिप्पण्या: