भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

रविवार, २८ जुलै, २०१३

5 रूपयात भरपेट जेवण

नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषे खाली येणार्या कुटुंबांच्या संख्येत मोठी घसरण झाल्याचा दावा केला आहे. भारतात २००५ च्या तुलनेत २०१२ मध्ये गरिबांची संख्या २२ टक्क्यांनी घटली आहे, असे आयोगाचे म्हणणे आहे.  या  म्हणण्यानुसार, शहरी भागातील ज्या व्यक्तीचे उत्पन्न ३२ रूपये तथा ग्रामिण भागातील व्यक्तीचे २७ रूपयांहून जास्त असेल ती व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली येत नाही. या माणकानुसार भारतातील गरिबांची संख्या गेल्या  काही वर्षांत झपाट्याने घसरली आहे.
नियोजन आयोगाच्या
अन्न, वस्त्र  आणि निवारा यांच्यासोबत आरोग्य आणि शिक्षण सभ्य समाजातील कोणत्याही नागरिकाची किमान गरज आहे. भारतातील ५ सदस्यांच्या कुटुंबात १ व्यक्ती कमावता आहे. ५ सदस्यांच्या कुटुंबात किमान १ लीटर दूध, डाळी, पालेभाज्या, भाकरी, भात, वस्त्रे,  घराचा किराया, मुलांची फिस, वीजबिल आणि औषधांची किमान गरज पूर्ण करण्यासाठी ग्रामिण भागात त्याला दरमहा किमान ४  हजारांची गरज आहे. सरकारने विविध राज्यात किमान मजुरीचा दर १२० ते १५० रूपये असा घोषित केला आहे. 25 दिवस दरमहा त्यांना मजुरी मिळाली, तर सरासरी ३ हजार दरमहा उत्पन्न प्रत्येक कुटुंबाचे असले पाहिजे. मात्र शहरी भागात किमान गरजा पूर्ण करण्यासाठी यात घरकिराया आणि वाहतुकीचा खर्च समाविष्ट केल्यास  किमान गरजा भागवण्यासाठी दरमहा ६ हजार रूपये लागतात. या उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असणार्या कुटुंबांचीच दारिद्र्य रेषेखाली नोंद करून त्यांना मदत केली पाहिजे. खर्या अर्थाने आज प्रत्येक गावात १२० रूपये मजुरी देऊनही मजूर मिळत नाहीत. अशाच पद्धतीने शहरातही १५० ते ३०० रूपये मजुरी सुरू आहे. ही मजुरी मोजूनही शहरी आणि ग्रामिण भागात मजुरीसाठी मजूर मिळत नाही हे सत्य आहे. असे माणले तर भारतात आता गरिबांच्या यादीत तेच परिवार येतील, ज्या कुटुंबात सदृढ कमावणारी व्यक्ती नाही. किंवा त्या कुटुंबातील एखादा व्यक्ती जाणिवपूर्वक काम करत नसेल.

या दाव्यानंतर देशात राजकारण्यांची वाकयुद्धे सुरू झाली आहेत. सर्वजण स्वतःचा आपला स्वतंत्र राग आळवत आहेत. माध्यमेही ढाबे आणि हॉटेलात जाऊन ५ किंवा १२ रूपयांची थाळी शोधण्यासाठी बाहेर पडली आहेत. सत्तारूढ पक्ष नियोजन आयोगाच्या दावा कसा योग्य आहे हे सांगण्यासाठी आकाशपाताळ एक करत आहेत. तर विरोधक सरकार आणि नियोजन आयोगाला आरोपीच्या पिंजर्यात उभे करून या संधीचा लाभ घेण्यासाठी गरिबांचे कैवारी असल्याचे ढोंग करत आहेत. सत्ताधारी, विरोधक आणि माध्यमे दारिद्र्य रेषेच्या माणकांसंबंधी योग्य व साथर्क चर्चा करण्याऐवजी, ढाबे आणि हॉटेलांपुरतेच मर्यादित राहून, या महत्वाच्या मुद्यावर आपापल्या फायद्याची चिंता करण्यात व्यस्त आहेत, हीच खरी चिंतेची बाब आहे. सामाण्य मानसाच्या दोन वेळच्या जेवणाचा मुद्दा चर्चेचा व्हावा, यासाठी सर्व सामान्य माणूस काही जनावर नाही.  मानवी जिवनाच्या सामाजिक व्यवस्थेत सामान्य नागरिकांच्या किमान गरजांनाच दारिद्र्य रेषेचे माणके ठरवली पाहिजेत. सरकार आणि समाजाने किमान गरजा सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य केले पाहिजे. मात्र भारतातील कोणताही राजकीय पक्ष यावर चर्चा करत नसल्याचे पाहून मोठे दुःख होत आहे. या गंभीर मुद्यावर सार्थक सुरूवात करण्याऐवजी एखादा नेता जामा मशिदीजवळ ५ रूपयांत भरपेट जेवण मिळत असल्याचा दावा करत आहे. तर दुसरा कुणीतरी मुंबईत १२ रूपयांत भरपेट जेवण मिळत असल्याचा दावा करत आहे. दुसरीकडे कुणीतरी पंतप्रधान आणि खासदारांसाठी एकवेळच्या जेवणासाठी हजारोंचा खर्च होत असल्याचा आरोप करत आहे. या सर्व चर्चेवरून गरिबांना २७ किंवा ३२ रूपयांच्या उत्पन्नात भरपेट जेवण मिळू शकेल हे कोण मान्य करू शकेल. ढाब्यापासून हॉटेल ताजपर्यंत चर्चा सुरू आहे. या चर्चेत गरिबांची चिंता कुणालाही नाही. होय, गरिबांच्या नावावर सर्वचजण आपापले स्वार्थ पूर्ण करण्यासाठी नगारे पिटण्याचे नाटक करत, गर्दीचे रूपांतर मतपेटीत करण्याचे नाटक मात्र  करत आहेत.
रालोआचे सरकार असताना नियोजन आयोगाचा जो दृष्टीकोन होता तोच दृष्टीकोन आजही त्यांचा आहे. सत्तेत असताना वेगळी भूमिका मांडायची आणि सत्तेतून बाहेर पडल्यानंतर अशा पद्धतीचे नाटक करून आपल्या मतपेटीचे राजकारण करायचे हेच राजकारण्यांचे खरे राजकारण आहे.
गरिबांच्या नावावर डझनभर योजना सुरू करून केंद्र व राज्य सरकारे अब्जावधी रूपयांचा चुराडा करतात.  गेल्या 50 वर्षांत अशा विविध योजनांवर सरकारी खजिन्यातील जेवढी रक्कम खर्च झाली त्याचा 25 टक्के भागही योग्य कारणांसाठी खर्च झाला असता तर भारतात आज गरिबीचे अस्तित्वही राहिले नसते. निवडणुकीच्या पूर्वी समाजाच्या कमजोर वर्गाला आकर्षित करण्यासाठी राजकारणी आणि राजकीय पक्ष मोठमोठे स्वप्ने दाखवून मत प्राप्त करण्याच्या बेतात असतात. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर गरिबांच्या नावाने योजना सुरू करून सरकारी खजिना कागदोपत्री वाटून घेऊन नोकरशहा आपल्या तुंबड्या भरतात. हा प्रकार अजूनही अव्याहत सुरू आहे.
काँग्रेस असो वा भाजप, एनडीए असो वा यूपीए, कोणतेही सरकार आपल्या मागील सरकारांचीच री पुढे ओढत असते. गरिबांचे मत मिळण्यासाठी कोणतेही ढोंग करायचे आणि स्वप्न दाखवून मत मिळाल्यानंतर पुढील ५ वर्ष त्यांना विसरून जायचे. गरिब आणि गरिबांच्या नावावर भारतातील राजकारणी, अधिकारी, सरकरी कर्मचारी आणि मोठमोठे उद्योगपती अब्जावधी आणि कोट्यधीश बनलेत. त्यामुळे आता दारिद्र्य रेषेच्या माणकांच्या  जागी अधिकार्यांनी श्रीमंतीचे मापदंड ठरवण्याची वेळ आली आहे.
गरिबांच्या नावावर ५० वर्षांपासून सुरू असलेली ही लूट बंद करून भारतीयांना स्वस्थ व कष्टाळू बनवण्यासाठी सरकारने नवनव्या संसाधनांची निर्मिती मात्र जरूर केली पाहिजे, हेच यावेळी सांगावेसे वाटते.

शुक्रवार, १९ जुलै, २०१३

चीन-भारत संबध

सुरूवातीचे दोन शब्द……
कोणत्याही गोष्टीची सुरूवात करताना व्यक्तीच्या हातून अनावधानाने चुका होतातच.  मी ही त्याला अपवाद नाही। मात्र स्वतःला आवड असणारी बाब केली नाही तर मनाला नेहमीच खंत वाटते. सुरूवातीला मी जेव्हा दैनिक देशोन्नतीमध्ये कार्यरत होतो.तेव्हा मी नजरेच्या टप्प्यातलं नावाचे एक सदर चालवित होतो. मधल्या काळात ई टीव्ही मराठीत रुजू झालो. तेथे चांगला अनुभव आला. जगाकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळाली. मात्र या काळात लेखणाची सवय काहीशी तुटल्यागत झाली. ई टीव्हीच्या जवळपास पावणे तीन वर्षांच्या सहवासानंतर आता पुन्हा एका दैनिक पुण्यनगरीच्या माध्यमातून प्रिंट मिडियाशी संबंध आला. त्यामुळे लिहिण्याची भावना पुन्हा एकदा उचंबळून आली आणि आज काहीतरी लिहायचेच या निमित्ताने मी भारत-चीन संबंधांवर आपली भूमिका मांडली. माझे मत कसे वाटले हे जरूर कळवा. काही सुधारणा असेल तर त्याचे स्वागत आहेच. काही चुकले असेल तर मोठ्या मनाने आपण ती निदशर्नास आणून द्याल हीच अपेक्षा.


 चीन-भारत संबध
डोंगरापुढे काहीकाळ नतमस्तक होणे हा आदर्शवाद असला तरी योग्यवेळी डोंगराचाच कपाळमोक्ष करणे हा व्यवहारवाद असतो, हेच धोरण भारताने चीनच्या बाबतीत स्विकारले पाहिजे……

भारताचे चीन सोबतचे राजकीय संबंध म्हणावे तशे फुलले नसले तरी, विद्यमान जागतिक गरज लक्षात घेता या दोन्ही देशांनी एकमेकांना ओळखून जुळवून घेणे फार आवश्यक आहे. भारतीय राजकारणाच्या अदुरदर्शी धोरणांमुळे भारताचे चीनसोबतचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत. १९६२ च्या भारत-चीन युद्धाला काहीअंशी भारताचे तत्कालीन धोरण जबाबदार आहेत, असे मला वाटते.  त्याचे कारण असे, १९४९ मध्ये चीनची स्थापना झाली होती. त्यानंतर आक्रमपणे विस्तारवादी धोरण स्विकारत चीनने पुढील ३  वर्षातच म्हणजे १९५२ मध्ये तिबेटमध्ये आपले लष्कर घुसवले. त्यावेळी तिबेटमध्ये दलाई लामांचे स्वतंत्र राज्य होते.  दुबळ्या तिबेटवर चिनी लष्कराने केलेले अत्याचार सर्वश्रूत आहेत. हे अन्याय अत्याचार आणि तिबेटचे वेगळेपण माहिती असूनही भारताने त्यावेळी तिबेट हा चीनचाच अविभाज्य घटक असल्याचे मान्य केले. चिनी लष्कराच्या छळाला कंटाळून १९५९ मध्ये दलाई लामा आणि त्यांच्या सहकार्यांनी भारतात आश्रय घेतला. एकिकडे तिबेटवरील चीनचे प्रभुत्व मान्य करणे आणि दुसरीकडे दलाई लामा यांना भारतात शरण देणे. या विरोधाभासी धोरणामुळे चीन भारतावर चांगलाच नाराज झाला. आणि त्यामुळेच त्याने १९६२ मध्ये भारताची कुरापत काढली. मुळात त्यावेळची परिस्थिती लक्षात घेतली असता भारताचे तत्कालीन दुटप्पी धोरणच चीनसोबतचे संबंध बिघडण्यास कारणीभूत असल्याचे प्रखरतेने जाणवते.
विद्यमान परिस्थितीत चीन जगातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. अमेरिकेपेक्षाही चीनची अर्थव्यवस्था झपाट्याने विकास साधत आहे.  अशा स्थितीत जगात महासत्ता म्हणून उदयास यायचे असेल तर कोणत्याही देशाला प्रथम आपल्या शत्रूंची संख्या कमी करणे क्रमप्राप्त असते.  इतिहासात अमेरिकेचे उदाहरण याला साक्ष आहे.  जगात आतापर्यंत दोन महायुद्धे झाली. या दोन्ही महायुद्धांची झळ साता समुद्रापार असलेल्या अमेरिका खंडाला बसली नाही. परिणामी अमेरिका जागतिक महाशक्ती म्हणून उदयास आली. तत्कालीन जगतात रशिया सुद्धा एक मोठी आर्थिक महासत्ता म्हणून परिचित होती.  मात्र दुसर्या महायुद्धातील सहभाग आणि त्यानंतर झालेल्या विघनाटमुळे रशियाची ताकद कमी झाली. याउलट अमेरिकेची स्थिती होती. अमेरिकेला कोणताही शत्रू नव्हता, तसेच युद्धाची झळही बसली नव्हती. त्यामुळे अमेरिकेच्या विकासात अडसर ठरणारी अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नव्हती. परिणामी अमेरिकेला बिनधोकपणे आपला विकास साधता आला.
 जागतिक महासत्ता होण्याचे हे सोपे सुत्र लक्षात घेऊन चीनने त्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली आहे. भारतासोबतचा सीमावाद शक्य होईल तेवढ्या लवकर सोडवून आपला एक शत्रू कमी करायचा हे धोरण सध्या चिनी सरकारने स्विकारले आहे. त्याअनुंषगानेच चीन भारतीय हद्दीत घुसखोरी करून भारताचे लक्ष या कळीच्या मुद्याकडे वेधण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचे सीमा प्रश्नांवर कोणतेही ठोस धोरण नाही. भारताची ही निस्तेज भूमिका जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणार्या चीनला मानवणारी नाही. त्यामुळेच चीन सातत्याने राजकीय डावपेच आखून भारतावर दबाव टाकत भारताला या मुद्यावर चर्चेच्या टेबलावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात चीनने घुसखोरी केली तरी तो भारतासोबत युद्ध करण्याची घोडचूक कधीच करणार नाही। हे चीनच्या आतापर्यंतच्या पाऊलखूनांवरून स्पष्ट होते. 
पुढील दशकात भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठेला नाराज करण्याची हिंमत चीन कधीच करणार नाही, असाही एक अंदाज आहे. यामुळेही चीन भारताविरोधात भविष्यात आक्रमक होण्याची फारच कमी शक्यता आहे.
...थोडक्यात भारत चीनला आपला क्रमांक एकचा शत्रू समजत असला तरी चीन मात्र भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणूनच पाहतो हे निश्चित आहे. तो भारतावर भविष्यात आक्रमण करून एक मोठी बाजारपेठ गमावण्याची घोडचूक करणार नाही. इतिहासातील कटू प्रसंग पाहता भारतानेही सावध भूमिका घ्यावी. आपले हितसंबंध जोपासत भारताने चीनला एक प्रतिस्पर्धी मानावे. आपला पारंपरिक आदर्शवादाला थोडेसे बाजुला ठेवून प्रत्यक्ष व्यवहारवादावर जोर देऊन भारताने जपान, व्हियतनाम आदी देशांसोबतचे आपले सर्वच क्षेत्रातील संबंध मजबूत करण्यावर भर द्यावा. विशेष म्हणजे थोडेसे हातचे राखून चीन वा पाकिस्तानसोबतचा सीमावाद संपवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे भारतालाही स्वतःचा विकास साधता येईल. तसेच असुरक्षिततेचा मुद्दाही आपोआपच निकाली निघेल.
डोंगरापुढे नतमस्तक होणे हा आदर्शवाद असला तरी योग्यवेळ येताच डोंगराचाच कपाळमोक्ष करणे हा व्यवहारवाद असतो, हेच धोरण भारतासाठी फायद्याचा आहे.